दिनांक: १२ जून, २०१५
एक मंत्री प्रवास करत असताना त्यांना एका खेड्यात एक मोठा सरकारच्या जाहिरातीचा बोर्ड दिसतो. त्या बोर्डवर लिहलेले असते,
'विजेची बचत हीच,
विजेची निर्मिती!'
मंत्री खुष होतात आणि गावातील लोकांना भेटण्यासाठी गाडी गावात थांबवतात. सर्वच गावकरी जमा होतात.
मंत्र्यांनी गावकऱ्यांना विचारले,
'बोर्ड वाचला का?'
गावकरी म्हणाले, 'काय लिहलंय त्यावर?'
'वाचता येत नाही तुम्हाला?'
म्हणाले, 'नाही!'
'गावात कोणालाच वाचता येत नाही?'
म्हणले, 'नाही!'
विचारले, 'गावात शाळा नाही का?'
'नाही!'
गावात शाळा नाही, कोणाला वाचता येत नाही आणि बोर्डतर लागलेला आहे. मंत्री जरा नाराज झाले आणि गावकऱ्यांना म्हणाले, 'अहो, असं काय करता? जग कुठं चाललंय!'
गावकरी म्हंटले, 'कुठे चाललंय?'
'अहो, असं करू नका, शाळा काढा.
गावकरी म्हणाले, 'कशाला?'
'पोरे शाळेत जातील!'
'मग काय होईल?'
मंत्री म्हणाले, 'पोरे शिकतील!'
'मग काय होईल?'
'त्यांच्या ज्ञानात वाढ होईल!'
गावकरी म्हणाले, 'बरंच आहे असे अडाणी, निदान शेतात तरी कामाला येतात. नाहीतर शिकून कुठे नौकर्या मिळतात?'
मंत्री म्हणाले, 'असं करू नका हो, शाळा काढा, पोरांना शाळेत घाला, पोरांना शिकवा, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल!'
पाचसहा वेळी मंत्री म्हणाले, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल.
गावकरी चिडले आणि म्हणाले, 'मंत्री महोदय! आमच्या गावाने ठरवलंय, शाळा काढायची नाही, शिकायचं नाही, ज्ञानात वाढ अजिबात करायची नाही कारण,
ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मिती आहे!'
(सौजन्य!: रामदास फुटाणे, युट्युब वरून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा