रविवार, २४ मे, २०१५

जेटलीसाहेब! भ्रष्टाचार करायचाय?

भारतीय सौर ३ ज्येष्ठ शके १९३७
२४ मे, २०१५

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारमुक्त सरकार तसेच महागाईवर नियंत्रण ही आपल्या सरकारची सकारात्मक कामगिरी ठरली आहे, असे मोदीसरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचे मूल्यमापन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २२ मे ला केले.

महागाईबद्दल नंतर बोलता येईल. पण भ्रष्टाचाराबाबत मोदीसरकारची दया येऊन काही जमलेतर मार्गदर्शन करावे, या व्यापक दृष्टीकोनातून त्यांना एक पत्र लिहले आहे. हे पत्र खाजगी असले तरी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला याचा काही लाभ मिळावा, म्हणून हे पत्र सार्वजनिक करत आहे.

माननिय अर्थमंत्री अरुण जेटलीसाहेब!
सा.न.वि.वि.
आपण मला ओळखत नसाल याची मला खात्री आहे. पण मी आपल्याला आणि भाजपसरकार मधील बर्‍याच मंत्री आणि संत्र्यांना ओळखतो. संत्री म्हणजे हिंदी मधील संत्री नसून नागपूर मधील प्रसिद्ध संत्री आहेत. त्याला हिंदीत नारंगी बोलतात. आपण जर गडकरीसाहेबांना विचारले तर ते संत्र्यांचा जागितक इतिहासपण सांगतील आणि नागपूरच्या संत्र्यांचा गोडवा विषद करतील. त्यांना वेळेची 'पुर्ती' जमत नसेलतर आमचे, आमचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननिय देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करावे. ते सुद्धा संत्र्यांची इथंभूत माहिती आपल्याला देऊ शकतील. त्यांना आपण ओळखत असालच. वातावरण जरा हलकेफुलके व्हावे म्हणून सांगतो की फडणवीस म्हणजे 'दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र' ह्या भाजपच्या घोषणेमधील देवेंद्र. हाहाहा! आले ना लक्षात? असो. मुख्य मुद्द्याला हात घालतो.

तर सांगायचा मुद्दा हा की आपल्या  विधानामुळे माझ्या मनाची थोडी चलबिचल झाली. वर्षभरात आपल्याला एकही भ्रष्टाचार नाही करता आला, म्हणून मन हेलावले. 'भ्रष्टाचार मुक्त सरकार' ही आपली चांगली कामगिरी आहे की मनातील खंत? त्याचा उलगडा काही बातमीतून होत नाही. महाराष्ट्रातील नमोभक्त सतत आमच्या डोक्यावर मारा करत असतात की '६० वर्षे काँग्रेसने भ्रष्टाचारच केला.' त्यावरून मला वाटते की भाजपलाही थोडाफार करता यावा. म्हणूनच हा पत्रप्रपंच.

काही असनदशीर मार्ग मी सुचवत आहे. बघा जमले तर! हाहाहा! 'जुमले' नाही हो. तर ऐका.

मार्ग १
नोकरशाहीला हाताशी धरणे.
हा एक अतिशय उत्तम मार्ग अणि नामी उपाय आहे. यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या सचिवाची बदली अशा ठिकाणी करावी लागेल की जे ठिकाण म्हणजे त्या अधिकार्‍याला शिक्षा दिल्यासारखे वाटेल. आणि हो ही बदली इतरांना करायला सांगायची. स्वतः करायची नाही. जसे की नरेंद्र मोदी तुमच्या कार्यालयातील अधिकार्‍याची करतील. किंवा इतर मंत्री करतील. बदली झाली रे झाली की बोंब ठोकायची, की हा अधिकारी मला परत पाहिजे म्हणून. आणि मग बदली रद्द झाली की तो अधिकारी कायमचा तुम्हाला बांधील राहिल. असे एकमेकांच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करुन सर्वच मंत्री स्वत:च्या सचिवांना कह्यात करू शकतील. हळूहळू मग त्या अधिकार्‍याबरोबर जवळकीनं वागा, बोला, त्यांच्या खाजगी आणि घरगुती कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावा. एकदा आपूलकी, प्रेम, जवळीक निर्माण झाली की ते स्वतःच तुम्हाला भ्रष्टाचाराचे सनदशीर   मार्ग दाखवतील. भरपुर अनुभव त्यांच्या गाठीशी असतो. एकेका कडून लाख-लाख रूपये घेण्यापेक्षा शंभरात एकाकडूनच दोन कोटी कसे काढायचे, हा मार्गही ते दाखवतील.

मार्ग २
पवारसाहेबांना महिन्यातून कमीतकमी न‍ऊ दहा वेळा फोन करणे.
लोकांना सांगायचे की शरद पवार साहेबांचा समाजसेवेचा अनुभव दांडगा आहे. शेतकर्‍यांच्या सुखदुःखे त्यांना माहित आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. आणि राजकारणात कोणीही अस्पृष्य नसतो. जसे गडकरीसाहेबांनी बघा कसे पवारसाहेबांचे मंत्रपदाची शपथ घेतल्यावर पाय धरले होते. तसेच. आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा हे मान्य केले की ते महिन्यातून तीन-चार वेळा शरद पवारसाहेबांना फोन करतात. तसेच करा. भरपूर फायदा होईल. नोकरशाहीला कसे कामाला लावायचे आणि आपलेसे करायचे हे त्यांच्यापेक्षा अधिक चांगले कोणीच राजकारणी जाणत नाही. १९९५ चा युतीचा काळ आपल्याला आठवत असेल. त्यावेळी असे बोलले जायचे की, प्रशासकीय आधिकारी मंत्र्यांची कामे बाजूला ठेवून अगोदर पवारसाहेबांचे कामे करायचे. इतका पाठिंबा त्यांना आहे आय‍एएस अधिकार्‍यांचा. मग बघा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचार करूनही नामनिराळे राहणे हे त्यांच्यासारखे कोणालाच जमणार नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराचे ट्रॅकभर पुरावे गोळा करणारे स्वतःच नामशेष झाले. आता सिंचन घोटाळाच घ्या. तुमचे ते तावडेसाहेब बोलले होते बघा. अजितदादांना गजाआड टाकतो म्हणून. काय झाले? काहीच नाही. कागदपत्रेच जळाल्यावर कोण काय करणार? खुप जणांनी त्यांना धोबीपछाड मारण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण हे पैलवान उभेच. तर लावत चला त्यांना फोन, सतत.

दुसरे एक सांगायचे आहे की, भ्रष्टाचार मुक्त सरकार ही फार मोठी कामगिरी आहे हे लोकांना सांगत जाऊ नका. लोकांनी तुम्हाला मतदान त्यासाठीच केले आहे. सर्वांनाच माहित आहे की नवीन राज्यकर्त्यांना लगेच भ्रष्टाचार करता येत नाही. त्यासाठी लागेबांधे तयार व्हावे लागतात. काळ जाऊ द्यावा लागतो. 'पी हळद अन हो गोरी' असे सहसा घडत नाही. म्हणून असे विधाने करत नका जाऊ. आम्ही तुम्हा सगळ्यांना आमचेच पैसे खात बसावे म्हणून निवडून दिलेले नसते. काँग्रेसने ६० वर्षे केले ते आम्ही एक वर्षात केले नाही, याला काय अर्थ आहे साहेब? विचार करा! असू देत आता.

बरे! भेटू या परत असेच. मध्ये मध्ये. आपल्याला सांगण्यासारखे नवीन काही सुचले तर पत्र पाठवत राहिलच.

कळावे! लोभ असावा! भ्रष्टाचाराचा!

आपला हितैशी
रामदास पवार
-अंबरनाथ

ता.क.: हे पत्र विनोद निर्मितीसाठी लिहले असून माझ्यावर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले म्हणून खटला वैगरे भरण्याच्या भानगडीत पडू नका. हाहाहा!

मोदींची प्रतिज्ञा!

दिनांक: भारतीय सौर ३१ वैशाख शके १९३७,
(२१ मे २०१५)

'भारत माझा देश आहे. तो मागच्या मे २०१४ पासूनच माझा झाला आहे. त्यापूर्वी तो काँग्रेसचा होता. ते आणि इतर सटरफटर पक्ष आणि त्यापक्षांचे कार्यकर्ते माझे बांधव बिलकूल नाहीत. १२५ कोटी जनता माझी आहे असे जरी मी बोलत असलो तरी माझ्या कथनी आणि करणी याचा फरक करायला शिका.'

'माझ्या देशावर माझे प्रेम आहे, पण ते आताच एक वर्षापूर्वीच निर्माण झाले आहे. त्या प्रेमापोटीच मी संपूर्ण जग पालथे घालत आहे. या पूर्वी मी फक्त गुजरातवर प्रेम करत असल्यामुळे फक्त गुजरातसाठी परदेशी गुंतवणूक आणायचो. पण आता लोकांनी देशासाठी मला निवडून दिल्यामुळे नाइलाजाने देशासाठी भटकभवानीसारखे मी अनेक देश पालथे घालत आहे. 'आलीया भोगाशी असावे सादर' याशिवाय पर्याय नाही. वर्षापूर्वी मला वाटायचे 'छोडो यार' या देशात काय ठेवले आहे? या देशात मी पूर्णतः बुडालो(डुब गये), काय बी होणार नाही इथं भारतात राहून.(कुछ होगा नहीं) म्हणून मी अमेरिकेत जाण्याचा परवाना मागत होतो. माझ्या गुजरातसाठी गुंतवणूक आणायला. तब्बल १२ वर्षे. पण नाही दिला अमेरिकेने विझा. देवा! मला वाचव या काँग्रेसी खासदारांपासून आणि अमर्त्य सेन, तेंडुलकर, आणि आनंदमुर्तीसारख्या लेखकांपासून, असे माझे गार्‍हाणे होते एक वर्षाअगोदर. (अरे भगवान बचायें भाई) कशाला या देशात जन्म झालाय माझा? काय पाप केले होते मी मागच्या जन्मी. कोणास ठाऊक. असे वाटायचे."

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेनच कसा? काय केले माझ्या पालकांनी? अटलजींनी मला राजधर्म पाळायला सांगितला. मी पाळत असताना पण. मी अडवाणींच्या रथयात्रेचे सर्वच संयोजन केले पण ते मोठे झाले आणि मला मोठे होताना पाहून रूसून बसले. ते जोशींचे मुरली! वाजत नाही तरीही वाराणसीला मला जागा सोडत नव्हते. कसे काट्यासारखे बाजूला काढले की नाही मी. मला नाही जमत मानपान देणे. अोबानांना सर्व जग मिस्टर प्रेसिडेंट बोलत असताना मीच एकटा त्याला एकेरीत बोलू शकलो. त्याचा मान ठेवला नाही तर हे कोण चिंधीचोर? असं मी म्हणणार नाही, पण.........कसे एकेकाला मी 'मान' देतो की घेतो हे आपण पाहालच.'

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, असे तुम्हाला वाटत असेलतर, ते सब झुठ आहे. काय परंपरा?  तीस वर्षे भारतात बहुमाताचे सरकार नव्हते, त्याचा आभिमान बाळगू की काँग्रेसने साठ वर्षे देशाला लुटले त्याचा? इतर परंपरा मी मानत नाही. व्यवसायिक परंपरा मी मानतो, कारण माझ्या रक्तातच व्यवसाय आहे. मी अदानी, अंबानी या परंपरा मानतो आणि म्हणूनच
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. आणि परदेशातून भारतात पैसा आणेल. कसाही! अंबानी-अदानी हे माझे देशबांधव असून त्यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे"

जय हिंद!
(ही प्रतिज्ञा काही प्रकट, तर काही मनातल्या मनात आहे, याची नोंद घ्यावी.)

ताक: नमोभक्त, नमोरुग्ण यांनी ही प्रतिज्ञा खरी की खोटी याचा शोध घेण्याच्या भानगडीत पडू नये. अस्मादिकाला 'मोदीवरोध' झालाय. हा त्यावर औषधी काढा घेतलाय बस. तसेच या रोगावर नवीन औषधही सूचवू नये ही विनंती.

शुक्रवार, १५ मे, २०१५

'पोलिसांचा सलाम नको'- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिनांक: भारतीय सौर वैशाख शके १९३७,
१२ मे २०१५

पणजी : 'मी एखाद्या ठिकाणाहून जात असेन, आणि तेथे पोलिस असतील, तर त्यांनी मला अजिबात सलाम ठोकू नये, असे मी त्यांना निक्षून सांगितले आहे. सलाम संस्कृती पटत नसल्याने पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना सलाम करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातून ही संस्कृती दुर करायला हवी.' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(मटा बातमी-११ मे, २०१५)
टिव्हीवर अशोका मालिका पाहताना तो 'चाणक्य' सतत बोलत असतो. 'मुझे इसमे कोई षडयंत्र नजर आ रहा हैं।' त्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पडयंत्रच दिसत असते. 'चाणक्य,' 'चाणक्यनिती,' हे शब्द  भाजपच्या संबंधित आणि अधिक जवळचे असल्यामुळे मलाही आपल्या विधानात काहीतरी 'षडयंत्र' दिसत आहे. विचारा कसे ते?
तर त्याचे असे आहे देवेंद्र साहेब! सलाम नाही ठोकायचा तर पोलिसांना नमस्कार तरी करावाच लागेल की नाही. ओळखीच्या आणि मोठ्या माणसांना नमस्कार करणे ही तर आपली भारतीय संस्कृती आहे. मग नमस्कार करून पोलिसांना खाली वाकावे लागेल. कारण तुम्ही गाडीत असणार. तुम्हीच बोलले आहात की 'मी एखाद्या ठिकाणाहून जात असेन, आणि तेथे पोलिस असतील, तर त्यांनी मला अजिबात सलाम ठोकू नये.' याचा अर्थ असा होतो की इतर वेळी तुम्हाला सलाम ठोकला तर चालेल. तुम्ही गाडीत. पोलिस उभा. तुम्हाला नमस्कार करायचा तर त्याला कमरेत वाकून नमस्कार करावा लागेलच. तुम्हाला दिसण्यासाठी. म्हणजे आता सलाम ठोकायचा नाहीतर सरळ सरळ 'मुजराच' करायचा.  जाऊ द्या. हलके घ्या. हलके घ्या म्हणजे टेक इट लाईटली. नाहीतर वेगळाच अर्थ घ्यायचे? 'हलके' या शब्दाला मराठीत वेगवेगळ्या अर्थछटा आहेत म्हणून बोललो.
एक विनंती आहे फडणवीस साहेब. सरकार काहीतरी काम करतंय हे दाखवण्यासाठी 'काहीतरीच' बोलत नका जाऊ खोटंनाटं. काय फायदा त्याचा? सहा महिने झाले तुमच्या सरकारला. ना दाभोळकरांचे खुनी सापडले ना पानसरेंचे. गृहखातं तुमच्याकडेच आहेत. त्याकडे लक्ष द्या. काय ह्या फालतू सॅल्यूटबिल्यूट वगैरेच्या भानगडीत पडता? कामं करा कामं! नाहीतर खडसेसाहेब आहेतच टपलेले.
बरं!  भेटू या असेच कधीमधी.
आपला आणि पोलिसांचा कैवारी,
-रामदास पवार
अंबरनाथ

शुक्रवार, ८ मे, २०१५

सोनियाबाई! लगे रहो!

दिनांक : भारतीय सौर १८, वैशाख शके १९३७,
८ मे २०१५


'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सारी सत्ता केंद्रित झाली आहे.' असा गंभीर (?) आरोप बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. 'एक व्यक्ती आणि काही निवडक लोकांचे हे सरकार, आठ महिन्यांपासून स्वतःला चौकशीपासून वाचवण्यासाठी माहिती आयुक्तांची नेमणूक करण्याचे टाळत आहे.' अशी 'घणाघाती' (?) टीका सोनियांनी केली.
-मटा बातमी
७.४.२०१५
वा! सोनियाबाई वा! काय गंभीर आरोप आपण केला आहे. पण याची सुरूवात कोणी केली होती. अहो बाई! सार्‍या जगाला माहित आहे की काँग्रेसच्या काळात सत्ता कुठे केंद्रित झाली होती. टाइम मासिकाने सुद्धा तुम्हाला जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान दिले होते. ते कसे काय? कसले गंभीर (पुचाट!) आरोप करता? अहो! त्या आमच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांना तुम्ही फक्त 'सह्याजीराव' करून ठेवले होते. एका वर्षातच त्याचा विसर पडला काय? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून -सोडून द्या असे वागणे. पटेल असे काहीतरी बोला. उगीच मगरीचे अश्रु नका ढाळू. कोणीही लक्ष देणार नाही अशाने तुमच्याकडे. मनमोहन सिंगांना नुसते 'आधुनिक वेठबिगार' बणवून ठेवले होते तुम्ही आणि तुमच्या त्या 'चंपक' मुलाने. पटेल, रुचेल असे काहीतरी बोला बाई. नाहीतर हत्ती चाललाय ऐटीत आणि तुम्ही आपले बसलाय..... बघा पटले तर. मला काय? मला एक सांगा की माहिती आयुक्तांची नेमणूक केली तर कोणाच्या जास्त चौकशा होतील? तुमच्या सरकारच्या की भाजप सरकारच्या? ते तर आत्ताच वर्षापूर्वी आलेत. 'झाकली मुठ सव्वा लाखाची' असते बाई. ती तशीच राहू द्या. कशाला 'खाजून खाजून अवधान' आणायचा प्रयत्न करताय. आमच्या पवार साहेबांकडून शिका काहीतरी. त्यांचं बघा कसं असतं. 'चित भी मेरी, पट भी मेरी.' बाकी तुम्ही समजदार आहात. लोक हसतील मलाच, तुम्हाला इतके समजावत बसलो तर. रामराम!
या मटाला पण काहीच कळत नाही. अहो कशालाही काहीही बोलता? 'गंभीर आरोप' काय? घणाघाती टीका काय? यामुळे तुम्हाला तरी कोणी गंभीरपणे घेईल काय? घण म्हणजे हातोडा. तोही मोठा हातोडा. मला तर ही स्मार्टफोनवर मारलेली टिचकी पण नाही वाटत. वापरा पण, तुम्ही वापरा. मराठी भाषेत शब्दांना काहीच कमतरता नाही. वापरायचे ते शब्द वापरा. भारीभारी शब्द वापरा. परिणाम शुन्यच आहे.
आपला हितचिंतक,
-रामदास पवार
अंबरनाथ.
(८.५.२०१५)