गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

उलटी अभियांत्रिकी

उलटी अभियांत्रिकी

मेईजी क्रांती (१८६८) नंतर जपानने अशी प्रतिज्ञा केली की जगाच्या सर्व कोपर्‍यातून ज्ञानाचा शोध घेण्यात येईल. कारण त्यापूर्वी कोणी ज्ञान दिले तरी हा जपान ते घेत नसे.

एकदा आधुनिक बनायचा निश्चय केल्यावर जपान झपाट्याने कामाला लागले. प्रगत देशांतून त्यांनी विविध देशांचे नमूने मागवले. त्या देशातील कंपन्यांनी सुद्धा मोठी आॅर्डर मिळण्याच्या आशेने आपले सर्वोत्तम नमूने पाठवून दिले. जपानने ते पूर्ण उघडून त्याचे रेखाचित्र, धातूचा वापर याबद्दल जाणून घेतले. (Reverse Engineering) त्यानंतर त्यामध्ये अजून सुधारणा करीत वस्तू उत्पादित केल्या. लवकरच प्रगत देशांतील कंपन्यांचा माणूस आशेने येई व विचारी की नमूने कसे वाटले? तर जपान म्हणे की बरे होते पण आमच्याकडे तर त्याहूनही चांगल्या वस्तू उत्पादित होतात. त्याला ते आपल्या वस्तू दाखवत. तो आश्चर्याने बघतच राही. जपान त्यालाच विचारी की आॅर्डर असेल तर सांगा.

यावरून आपल्या लक्षात आले असेल की भारताची 'मेक इन इंडिया' ही वरील गोष्टीची सुधारित आवृत्ती आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी आपले मोदीजी खुप वेळा जपानला जाऊन आलेले होते. यावरून काय ते समजा. ही 'मोदीक्रांती' आहे.

©रामदास पवार
अंबरनाथ
(२४ डिसेंबर, २०१५)

संदर्भ :
MAHARASHTRA TIMES: उगवता सूर्य - जपान
http://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/Japan-History/articleshow/50302348.cms

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

शनैश्चर कृतां पीडां न कदाचित् भविष्यति

दिनांक: ७ डिसेंबर, २०१५

ज्यांचा देवावर विश्वासच नाही तेच लोक महिलांना शनीच्या मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे, असा हट्ट धरून बसले आहेत. भांडत आहेत. झगडत आहेत.

ज्या महिलांना शनीच्या कोपाची भीती वाटत नाही त्याच शनी शिंगणापुरच्या शनी चौथऱ्यावर जातील. ज्या महिला जातील त्यांनाच त्याची फळे भोगावी लागतील. (खरेखोटे शनीच जाणो) मग त्यात इतरांनी लुडबुड करण्यात काय हाशील आहे? ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल ही म्हण लोक विसरले काय?

जे लोक दुधाचा अभिषेक करून शनी देवाला शुद्ध करत आहेत त्यांचा खुद्द देवावरही विश्वास नाही असे वाटते. देव अशुद्ध होऊच कसा शकतो? ज्या दुधाचा अभिषेक केला जातो ते शुद्ध असते, असे समजणे खुळेपणाचे लक्षण आहे.

भारत म्हणजे जगातील सर्वात मोठा लोकशाही गोंधळ आहे.

खंडेराया आमचे कुलदैवत असूनही मी अजूनही जागरण गोंधळ घातला नाही म्हणून, मी या सर्व गोंधळात एकदम न्यूट्रल आणि अलिप्त आहे!

ॐ शं  शनैश्चराय नमः

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

लग्नाआधी बायकोचे प्रेम प्रकरण!

दिनांक : २८ नोव्हेंबर, २०१५

महाराष्ट्र टाइम्स मध्ये डाॅ. राजन भोसले वाचकांच्या पत्राला उत्तरे देतात. एकाने प्रश्न विचारला की "माझ्या बायकोने मला सांगितले की, तिचे लग्नाअगोदर एका मुलावर प्रेम होते. तेव्हापासून मला तिचा संशय यायला लागला आहे. तिचं चारित्र्य शुद्ध नसल्याची भावना मनात सतत येत राहते. कशातच स्वारस्य वाटत नाही."

डाॅक्टरांनी त्यांना  समजावून सांगितले की, 'यौवनात सर्वानाच आकर्षण निर्माण होते. तुम्हालीही झाले असेलच. बायकोने तुम्हापासून काही लपवले नाही म्हणजे उलट तिचा तुमच्यावर खुप विश्वास आहे असे दिसते आहे. म्हणून काहीच वाईट विचार मनात न आणता सुखाने संसार करा."

ह्या लेखाच्या शेवटी वाचकांनी सुद्धा प्रश्नकर्त्याचे शंका निरसन केले आहे. ते वाचून त्या बिचाऱ्याने हसावे, रडावे की आणखी काय करावे हे तुम्हीच ठरावा.

कडक बेधडक म्हणतात,
"मुली म्हणजे, मी नाही त्यातली कडी लाव आतली, अशाच असतात..."

पृथ्वीवरील साहेबराव साहेब म्हणतात,
'आधी कितीही लफडी करायची मग लग्नावेळी पैशावाला मुलगा हेरायचा, असेच मुली करतात'

ललित पाटील म्हणतात,
"एखाद्या वेळेस असे होऊ शकते. शरीरसंबंध देखील येऊ शकतात. पण स्वभाव चांगला हवा. एखादे गंभीर स्वरूपाचे प्रेम प्रकरण असणे वेगळे आणि तीनचार लफडी असणे वेगळे. लग्नाअगोदर तीनचार लफडी असतील तर मात्र तुमचे अवघड आहे."

एक अनामिक म्हणतात,
"ही किर्कोळ गोष्ट, लग्ना नंतरही काही बायका प्रेम नाही पण दुसर्‍या पुरुषाचा अनुभव घेतात."

राजेंद्र शहा म्हणतात,
"चालू ठेवा पोरगी खरी आहे!"

आझाद हिंद सांगतात-
"अजिबात संशय करायचा नाही. नशिबाने जे भेटला, त्यात खुष राहायचा. जय हिंद!"

पाहिलं ना मराठी माणूस फुकटचे सल्ले देण्यात किती वाकबगार आहे ते?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4108373.cms

जय सहिष्णुता!

दिनांक: २ डिसेंबर, २०१५

हेरगिरी रॅकेटमध्ये पाकिस्तानी कर्मचारी-मटा बातमी

बघा हा आपला महाराष्ट्र टाइम्स. मुंबईचे नं. १ मराठी वृत्तपत्र.  बातमीचा मथळा काय दिलाय पहा. 'हेरगिरी रॅकेटमध्ये पाकिस्तानी कर्मचारी.' या बातमीत आयएसआयचे एजेंट असल्याच्या आरोपात दोन जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे आहेत कफैतुल्ला खान आणि बीएसएफचा हेड कॉन्स्टेबल अब्दुल रशीद. या दोघांपैकी कोणीही पाकिस्तानी कर्मचारी नाही. दोघेही भारतीय आहेत. त्यांचा हात हेरगिरीत आहे आणि ते पाकिस्तानच्या आयएसआय साठी हेरगिरी करत होते म्हणून पकडले गेले आहेत. यातील कफैतुल्ला खान याने पोलिसांना सांगितले की त्याला पाकिस्तानमध्ये बोलावले होते आणि त्यासाठी विसासाठी भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुतातील एका कर्मचाऱ्याची मदत घेण्यास सांगितले होते. ज्याचे नाव याला माहित नाही.

वरील बातमीत महत्वाचे काय आहे? पकडले लोक की ज्याचे नावही माहित नाही असा पाकिस्तानी कर्मचारी? ज्याला अटक केली तो बातमीचा मथळा होईल की ज्याचे नाव माहित नाही, जो अजून अंधारात आहे, त्याचा मथळा होईल? त्यात ही बातमी मटाला महत्वाची वाटली नाही म्हणून शेवटच्या पानावर छापली आहे ती कोपऱ्यात. बातमीत इतका संभ्रम निर्माण केलाय की अपराधी कोण आहे, हेच कळणार नाही.

का केले असावे असे महाराष्ट्र टाइम्सने? तुम्हाला आणखी एक सांगतो. मागच्या ७ दिवसात हेरगिरीच्या आरोपाखाली एकून ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी बातमी एनडीटिव्हीने दिली आहे.
वरील दोघे आणि मेरठ मधून मोहम्मद एजाज, कोलकत्यामधून इरशाद अंसारी, त्याचा मुलगा अश्फाक व नातेवाईक मोहम्मद जहांगीर असे एकून सहा. सहा चे सहा मुसलमान आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यातील अब्दुल रशीद हा बिएस‍एफचा सैनिक आहे. तो भारतीय स्थलसेना आणि वायूसेनेचे गुपित दस्तऐवज पुरवत होता. दोन वर्षांपासून ते हेरगिरी करून आय‍एस‍आयला माहिती पुरवत आहेत.

आता प्रश्न हा उरतो की महाराष्ट्र टाइम्स हे का लपवतो आहे? आहेत भारतीय मुस्लिम पाकिस्तानचे एजेंट तर आहेत, त्यात लपवून काय मिळणार आहे? कोंबडं झाकून ठेवले म्हणून आरवायचे थांबत नाही हे मटाला माहित नाही काय?

म्हणजे 'मुसलमानांचे ठेवायचे झाकून आणि हिंदूंचे पाहायचे वाकून' यालाच तर सहिष्णुता म्हणत नसावेत?

मीही तुम्हाला सांगतो की, हे ६ जण देशद्रोही निघाले म्हणून सगळेच मुसलमान असे असतात हे समजू नका. मनात काही वाईट वक्टे आणू नका. परमवीरचक्र अब्दुल हमिदला आठवा.

जय सहिष्णुता! जय हिंद!

हेरगिरी रॅकेटमध्ये पाकिस्तानी कर्मचारी
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Technology-drove-Master-Raja-into-police-web-Heres-all-you-need-to-know-about-the-ISI-spy/articleshow/49990264.cms?utm_source=MT&utm_medium=socialplatformname&utm_campaign=onpagesharing  via @maharashtratimes: http://app.mtmobile.in

भारत की जासूसी के लिए बीएसएफ और पुलिस में आईएसआई के एजेंट, दो गिरफ्तार
http://m.ndtv.com/khabar/isi-agent-in-indias-bsf-and-police-for-spying-two-arrested-1249378

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

असहिष्णू भारत!

दिनांक : २५ नोव्हेंबर, २०१५

हो! हो! भारत १००% असहिष्णू झाला आहे, असे मला वाटते आहे.

अमिर खानच्या बिचार्‍या बालिश बायकोने एक साधा प्रश्न विचारला, की आपण देश सोडून जाऊ या का म्हणून.  तर अमिर खानने तेव्हढ्याच निरागसपणे मिडियाला हा प्रश्न सांगितला. त्यात त्याचे काय चुकले? त्यासाठी एव्हढा गदारोळ माजला याचाच अर्थ भारत असहिष्णू झाला आहे. कोणालाही आपले मन मोकळे करण्याची मुभा देणे म्हणजे सहिष्णुता आहे. हो की नाही?

दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लेखक आपले पुरस्कार परत करत आहेत. त्यात एव्हढे वाईट वाटण्यासारखे काय आहे? नाही आवडत त्यांना भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, साक्षी महाराज आणि बरेच लोक. त्यांना काँग्रेस जवळची वाटते हा काय गुन्हा आहे काय? नाही ना?  मग त्याचा इतका गवगवा कशाला? ते तर आपले पुरस्कार शांततेने परत करत आहेत. त्यांनी काही जाळपोळ, तोडफोड, खुन, मारामाऱ्या केल्यात की दहशतवाद माजवलाय?  त्यांना भारताचे वातावरण असहिष्णू वाटतंय तर वाटतंय.  लोकशाही आहे. कोणालाही काही वाटण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. अशा लोकांना देशद्रोही ठरवणे म्हणजे असहिष्णूता नाहीतर दुसरे काय आहे?

म्हणून मला वाटते भारताचे वातावरण असहिष्णू आहे. मला कोणी परदेशात पाय पण ठेऊ देणार नाही, नाहीतर ....

बाजीराव-मस्तानी

दिनांक : २२ नोव्हेंबर, २०१५

संजय लिला भन्सालीच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमा विरोधात भरपूर गदारोळ चालू आहे. मला वाटते की ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत चित्रपट लेखक, निर्माता यांनी खूपच काळजी घेतली पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावणार नाही हे पहिले पाहिजे. परंतु आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे आणि कोणालाही काहीही लिहता येते, व्यक्त होता येते. म्हणून लेखक, चित्रपट निर्मातेही काहीही लिहतात, दाखवतात. त्याला आपण कायद्याने काहीच करू शकत नाही. फक्त लोकशाही मार्गाने धरणे धरू शकतो. निषेध मोर्चे काढू शकतो. बाकी काहीच करू शकत नाही. मागे अमीर खानचा पीके आला. भरपूर विरोध झाला त्याला. पण काय झाले. काहीच नाही. उलट अती प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपट भरपूर चालला. मागे जोधा अकबर हा चित्रपट आणि त्याच नावाची मालिका यांनाही भरपूर विरोध झाला. पण काय झाले? निर्मात्यांनी एक ओळ टाकली, 'हा चित्रपट ऐतिहासिक आहे,असा आम्ही दावा करत नाही.' बस! संपला विषय. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मालिकाही. नंतर सर्व चिडीचूप.

आता बाजीराव मस्तानी या चित्रपटाबद्दल सुद्धा असे होऊ शकते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याला अजूनही भरपूर वेळ आहे. १८ डिसेंबरला गोंधळ घालणार आहे तो. म्हणजे एक महिना आहे आणखी. तोपर्यंत तरी भंसाली काही करणार नाही. म्हणून तोपर्यंत 'पिंगा' या गाण्याला विरोध करणारे गोंधळ घालणार.  त्याच्या चित्रपटाला अशीच प्रसिद्धी मिळणार, फुकट. आणि शेवटी काय होणार? काहीही नाही. गाणे तसेच राहील आणि विरोधक सुद्धा गप्प बसतील.

कारण....

कारण चित्रपटात ज्या गाण्यात मस्तानी आणि काशीबाई यांना नाच करताना दाखवले आहे, त्या अगोदर फक्त श्रीमंत बाजीराव पेशवे असे स्वप्न पाहतील की मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाच करत आहेत. विषय संपला. बाजीरावांनी काय स्वप्ने पहिली असतील याची इतिहासात कुठेही नोंद नाही. याला इतिहासाचे विकृतीकरण म्हणता येणार नाही मग. कल्पनेची भरारी असेल ती. जशी '१५ लाख तो हरएकके खाते में ऐसेही जमा हो जायेंगे', तशी.

जाताजाता: चित्रपट खूप भव्यदिव्य आहे आणि सर्वांना तो आवडेल असे ट्रेलर वरून तरी जाणवत आहे. बेस्ट डायलॉग- बाजीरावने मस्तानीसे मोहब्बत की है,  ऐयाशी नही.

https://youtu.be/eHOc-4D7MjY

कडोंम महापौर

दिनांक: १४ नोव्हेंबर,२०१५

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर महापौर तर भाजपचे विक्रम तरे उपमहापौरपदी विराजमान झाले.
-बातमी

"कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १४ नगरसेवक म्हात्रे आडनावाचे निवडून आले आहेत. त्या खालोखाल १३ भोईर आणि ११ पाटील आडनावाचे आहेत.
म्हणून महापौर म्हात्रे आडनावाचा, उप-महापौर भोईर आडनावाचा आणि स्थायी समिती अध्यक्ष पाटील आडनावाचाच पाहिजे होता.

लोकशाहीत बहुमताला काही महत्व आहे की नाही?  शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष हुकुमशाही पक्ष आहेत"

आतापर्यंत पवारसाहेब, राधाकृष्ण विखेपाटील यापैकी कोणीच असे का अजूनही बोलला नाही? काहीतरी गडबड आहे.

ताक: आता कमीतकमी स्थायी समिती अध्यक्ष तरी यापैकी कोणत्या तरी आडनावाचा झालाच पाहिजे, असे तरी बोला. म्हणजे विरोधी पक्ष कोणीतरी आहे याची जाणीव लोकांना होईल.

ही पोस्ट केल्यानंतर काहींच्या लक्षात हे आले नाही की ही पोस्ट उपरोधीक आहे. एका म्हात्रेने लिहले की आम्ही शिवसैनिक आहोत. वरुन जो आदेश येईल तो आम्ही मान्य करतो. तर एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने टिप्पणी केली की हा शिवसेना-भाजपचा अंतर्गत मामला आहे, त्या शरद पवार कशाला लक्ष घालतील.

चुकीची मराठी

दिनांक : १७ नोव्हेंबर, २०१५

'बरोबर पकडलं
माझ्यासोबत डिनर

जर तुम्हाला ऐकू येण्याची समस्या आहे तर लगेच तुमच्या जवळच्या हिअरिंग प्लस शाखेत पोचा. आणि योग्य हिअरिंग एड घेऊन माझ्यासोबत डिनरसाठी तयार होऊन जा.'
-कपिलदेवची मटामधिल जाहिरात

१) कपिलदेव बरोबर जेवण करण्यासाठी ऐकू येणे आवश्यक आहे का?

का?

असंच जमणार नाही का?

२) हिअरिंग एडच्या शाखेत पोचा (मारा) की पोहचा?

३) बरं ठिक आहे, पोहचलो.

नंतर? 

कपिलदेव बरोबर तयार होऊन कुठे जायचं?

घरी?

काय हे? आमच्या मराठी भाषेची पारच वाट लावतात हे लोक!

बिहार निवडणुकीत भाजपला घवघवीत यश?

दिनांक: ९ नोव्हेंबर, २०१५

बिहार निवडणुकीत भाजपला घवघवीत यश. विरोधकांचे दात घातले त्यांच्याच घशात. जे विरोधक भाजपला फक्त ६ जागा मिळाव्या म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते, त्यांना दिली एक सणसणीत चपराक. ६ च्या ठिकाणी ५३ जागा मिळवून दाखवल्या. लालू प्रसाद, काँग्रेस आणि नितीशकुमार यांची अभद्र युती झालेली असताना हे यश विशेष उल्लेखनीय आहे, यात तिळमात्र शंका नाही. विरोधक आता तोंड लपवून बिळात जाऊन बसले आहेत.

हाहाहा! मोदीजी और अमितजी तुसी ग्रेट हो!

©रामदास पवार
अंबरनाथ
(९ नोव्हेंबर, २०१५)

ज्यावेळी बिहार निवडणूकीचा निकाल लागला तेव्हा भाजपला बहुमत तर नाहीच परंतु खुपच कमी जागा मिळाल्या. त्यावेळी भक्त म्हणायला लागले की, मोदीजी एकलव्यासारखे एकटे बिहारमध्ये लढले. भाजप विरोधात लालू, नितिशकुमार, काँग्रेस एकत्र आले म्हणून भाजपचा पराभव झाला. बिहारचे लोक अडाणी आहेत. त्यांना जंगलराजच पाहिजे. लालूने नितिशकुमार यांना जरी मुख्यमंत्री बणवले असलेतरी खरा वचक लालूचाच राहिल कारण लालूला जास्त जागा मिळाल्या आहेत. या निवडणूकीने भाजपच्या गोटात बराच गोंधळ उडाला. अडवाणी, जोशी, शत्रुघ्न सिन्हा हे नाराज झाले.

वरील पोस्ट टाकण्यापुर्वी ४ आॅक्टोबरला खालील पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ती पोस्ट मी पुन्हा वरील पोस्ट बरोबर शेअर केली. ती पुन्हा खाली देत आहे.

बिहारच्या निवडणूकीत भाजपचे 'दिल्लीपत' व्हावे. दिल्लीला तिन सिट मिळाल्या. त्यामुळे भाजपचे आमदार तिन आसनी रिक्शातून विधानसभेत जाऊ शकतात. बिहारमध्ये जागा अधिक आहेत. म्हणून त्यांना सहा सिट मिळाव्या. त्यामुळे भाजपच्या अामदारांना सहा सिटर रिक्षा वापरता यावी. भाजपच्या बर्‍याच लोकांची चरबी उतरावी. असे वारंवार का वाटते आहे, कळत नाही.
आता भक्त येतील आणि मला म्हणतील, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.' तर काही म्हणतील, 'दुसर्‍याचे वाईट चिंतने सदृढ मनाचे लक्षण नाही.'
म्हणू देत. मला वाटतं ते लिहलं.

रामदास पवार
अंबरनाथ
(४ आॅक्टोबर, २०१५)

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

कल्याण-डोंबिवली मनसेचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा?

दिनांक: भारतीय सौर १५ कार्तिक शके १९३७,
६ नोव्हेंबर, २०१५

प्रिय राजसाहेब,
सस्नेह जय महाराष्ट्र!

बरेच दिवस पत्र लिहण्याचा खटाटोप केला नाही. मागच्या वर्षी सेना-भाजप युती तुटली तेव्हा आणि विधानसभेचे निकाल लागले तेव्हा पत्र लिहले होते. त्यानंतर तसा योगच जुळून आला नाही.

आज पुन्हा आपल्याला काही सांगायचे आहे. विधानसभेच्या विदारक पराभवानंतर आपण त्यांचे कारणे शोधली असतीलच. तरीही मला जी कारणे वाटतात ती सांगतो.
पहिले कारण असे की, मागच्या  लोकसभेला आपण विनाकारण उमेदवार उभे केले होते.
आपण वारंवार सांगत आला आहात की महाराष्ट्र हीच माझी खेळपट्टी आहे. तरीही आपण दिल्लीच्या मैदानात खेळाडू उतरवलेत आणि तेही मनसेची मातृ संघटना असलेल्या शिवसेने विरोधात. त्यात पुन्हा आपण हेही सांगितले की माझे खासदार मोदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देतील. लोकांना जर असे वाटले असेल की सरळ घास घेण्यापेक्षा उलटा का घ्यावा, तर त्यांचे काही चुकले असे म्हणता येणार नाही. म्हणजे सरळ भाजप-सेनेलाच का मतदान करू नये. म्हणूनच लोकांनी भाजपला आणि भाजपची युती असलेल्या शिवसेनेलाच मते देऊन निवडून दिले.
आता आपण जसा निर्णय घेतला आहे की खासदारकीची निवडणूक यापुढे मनसे लढणार नाही हाच निर्णय जर तेव्हा घेतला असता तर झाकली मुठ सव्वा लाखाची झाली असती. इतकी अधोगती झाली नसती.  कारण तेव्हा आपला बराच दरारा होता. म्हणून तर नितिन गडकरींना आपल्या घरी येऊन आमच्या विरोधात उमेदवार उभे करू नका अशी विनवणी करावी लागली होती. बोलू नये पण बोलल्या शिवाय राहवत नाही. गडकरी काय आले अन 'भुरळली शेळी आणि लागली लांडग्याच्या पाठीमागे' अशी आपली गत झाली. लांडगेच ते. भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष नको आहेत. प्रादेशिक पक्षांना ते कधी शेळीसारखे खातील त्याचा भरवसा नाही. असो. झाले ते झाले. पण यापुढे अशा पक्षांपासून सावध रहा म्हणजे झाले. त्यांच्या जवळ जाऊन तोटाच होईल, ही रेल्वे इंजिन वरची चिमणी आहे. (काळ्या दगडावरची रेघ ऐवजी आपले इंजिन उदाहरणादाखल घेतले.) गरज सरो आणि वैद्य मरो अशी त्यांची रीत आहे. भाजपने मागच्या वर्षीच २५ वर्षांची युती तोडून याचा पुरावा दिला आहे.

आता मुळ मुद्याला हात घालतो. भाजपचे मधाचे बोट काय काय परिणाम करते ते आपण पाहिलेच. त्याचाच परिणाम म्हणून लोक आपल्याला राजकारणातून बाद करायला निघाले आहेत. म्हणूनच कल्याण-डोंबीवली महापालिकेत आपण २७ चे ९ वर आलो आहोत. तरी हरकत नाही. या ९ नगरसेवकांमुळे सुद्धा आपण भविष्यात मोठे यश गाठू शकता. अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. २७ मधून ९ गेले तर उरले काय? तर उत्तर आहे काहीच नाही. हे कसे तर २७ नक्षत्रांपैकी पावसाचे ९ नक्षत्र वजा केले तर काहीच शिल्लक राहत नाही. पाऊस नाही तर काही नाही. म्हणून आपले जे ९ नगरसेवक निवडून आले आहेत, ते पावसा इतकेच महत्वाचे समजा. आणि त्यांचा योग्य तो वापर करा.

म्हणजे काय करा की, आता जी कल्याण-डोंबिवली महापालिकेची त्रिशंखू अवस्था झाली आहे, तिला योग्य तो आधार द्या. शिवसेना आपली आहे. सेनेचे अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणून देऊन टाका शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा. भाजपचा घोडेबाजार आपोआप थांबेल. वळणावर येतील. लोकही शबासकी देतील.
करता राजसाहेब इतके? कराच! मग बघा!  पुढचा काळ गौरवशाली असेल. उद्धव आणि तुम्ही एकत्र आलात तर सर्वांचीच पळता भूई थोडी होईल.

लोभ आहेच, तो आणखी वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा!

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०१५

नायक-खलनायक

दिनांक: ६ आॅक्टोबर, २०१५

टिव्हीवर जोधा अकबर आणि महाराणा प्रताप या दोन मालिकेतील अंतर फक्त दिड तासाचे आहे. साडेअाठला जोधा अकबर ही मालिका असते आणि दहा वाजता महाराणा प्रताप.  साडेआठला जो अकबर नायक असतो, तोच दहा वाजता खलनायक होतो.तेही रोज. जोधा अकबर मध्ये अकबर असा चितारलाय की त्याच्या सारखा राजा दुसरा कोणी नसावा. दयाळू. प्रेमळ. प्रजेवर अतोनात प्रेम करणारा. एकवचनी. स्वतःचे कोणतेही वचन पूर्ण करणारा. सहिष्णू. हिंदू आणि मुसलमान यांना समान हक्क देणारा राजा. कोणतेही भेदभाव न करणारा. म्हणजे आपल्याला तो पूर्णतः नायक वाटतो. त्याच्या आनंदात आपण सहभागी होतो. त्याचे दु:ख आपल्याला दुखी करते. याच्या नेमके उलट दहा वाजता असणाऱ्या महाराणा प्रताप या मालिकेत पाहायला मिळते. पक्का भुक्कड राजा. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री अंमल व्हावा यासाठी कोणत्याही थराला जाणारा. राजपुत राजांमध्ये भांडणे लावणारा. जबरदस्तीने राजपुतांच्या बायका करून राज्य वाढवणारा. लढाईत शत्रुपक्षाच्या प्रजेला सुद्धा त्रास देणारा अमानुष राजा. विनाकारण महाराणा प्रताप यांना त्रास देणारा. ना बाईकांची ना आईची किंमत करणारा. असे वाटत राहते की याचे वाईटच व्हावे.

पण असे का व्हावे. राजा तर एकच आहे. या ऐतिहासिक मालिका आहेत. पूर्ण चित्रपटीय स्वातंत्र्य घेऊनही कोणी अधिक बदल करू शकत नाही. मग असे का होते? याचे कारण आहे या मालिकेचे लेखक. प्रत्येक मनुष्यात सद्गुण असतात तसे दुर्गुण सुद्धा असतात. पण जोधा अकबरचा लेखक आपल्या समोर अकबराचे फक्त सद्गुण दाखवतो. तर महाराणा प्रतापचा लेखक फक्त दुर्गुण. आणि तिथेच आपली फसगत होते. अवघ्या दिड तासात आपल्या मनात प्रेम आणि राग असे दोन्ही उत्पन्न होतात.

याचा अर्थ असा होतो की, कोणाला नायक किंवा खलनायक करायचे हे या मालिकेचे लेखक ठरवतात. दोन वेगवेगळे लेखक दिड तासात माझ्या मनाचे जादूई मतपरिवर्तन करू शकतात. म्हणून गांधी, नेहरू, सावरकर यांच्याविषयी मते बणवण्यापुर्वी विचार करा. कारण यांच्याविषयी सुद्धा लिहणार्‍या लेखकाने फक्त दुर्गुणच उचलले असतील तर? किंवा फक्त सद्गुण दाखवून वाईट गुणांकडे दुर्लक्ष करत असेल तर.

म्हणून कोणा विषयी मत बणवण्यापुर्वी हजारदा विचार करा.  नाहीतर आपली गत चक्रधरस्वामींच्या कथेतील पाच आंधळ्यांसारखीच होईल.

बिहार निवडणूक

दिनांक: ४ आॅक्टोबर, २०१५

बिहारच्या निवडणूकीत भाजपचे 'दिल्लीपत' व्हावे. दिल्लीला तिन सिट मिळाल्या. त्यामुळे भाजपचे आमदार तिन आसनी रिक्षातून विधानसभेत जाऊ शकतात. ज्या दिल्लीत लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला सर्वच्यासर्व सर्व म्हणजे सातही जागा मिळाल्या, त्याच दिल्लीत भाजपला ७० पैकी फक्त ३ जागा जिंकता आल्या. सहा महिन्यात भाजपची अशी अधोगती झाली याला भाजपचा मुजोरपणा कारणीभूत होता. त्याची फळे भाजपला मिळाली.

आता बिहारच्या निवडणूका आहेत.  बिहारमध्ये जागा अधिक आहेत. म्हणजे दिल्लीपेक्षा अधिक. म्हणून त्यांना सहा सिट मिळाव्या. त्यामुळे भाजपच्या अामदारांना सहा सिटर रिक्षा वापरता यावी. भाजपच्या बर्‍याच लोकांची चरबी उतरावी. असे वारंवार का वाटते आहे, कळत नाही.

तसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ लाख २५ हजार कोटी रूपयाचे पॅकेज जाहीर केले. ते असे केले जसे बिहारचा लिलाव चाललाय. भाषणात ते म्हणाले, 'की भाईयों, आपको कितना पैसा चाहिए बोलो. साठ हजार करोड? सत्तर हजार करोड? अस्सी हजार करोड? नब्बे हजार करोड? मै पुरे सव्वासो हजार करोड रूपया बिहारको देता हुँ।" बिहारला मागच्या वर्षी पुर आला होता तेव्हा काश्मीरला गेले पण बिहारला मदत केली नाही. भाजपच्या लोकांना लोकसभेत बहुमत मिळाल्यापासून गर्व झाला आहे. हे गर्वाचे घर खाली व्हावे म्हणून वाटते फक्त सहाच जागा मिळाव्या.
आता भक्त मला म्हणतील, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.' तर काही म्हणतील, 'दुसर्‍याचे वाईट चिंतने सदृढ मनाचे लक्षण नाही.'
म्हणू देत. मला वाटतं ते लिहलं.